Sustain Humanity


Tuesday, January 5, 2016

Sunil Khobragade संघीय प्रतिकांती आणि नादान आंबेडकरवादी



संघीय प्रतिकांती आणि नादान आंबेडकरवादी


By Sunil Khobragade


(Editor,Marathi daily Mahanayak and heads yet another Republican party)


हिंदूंमधील उच्चजातीय पुरुषांची संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ख्रिश्चन धर्मियांची स्वतंत्र संघटना काढण्याचे ठरविले आहे. यासाठी संघ परिवाराच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे संयोजक इंद्रेशकुमार तसेच केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ख्रिश्चन धर्मगुरुंची बैठक घेतल्याचे समजते. रा.स्व.संघाशी संबंधित एकूण संघटना ज्याला संघ परिवार संबोधले जाते, अशांची संख्या आजमितीस जवळपास 60 च्या घरात आहे. यामध्ये राजकीय, सामाजिक, कामगारक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, साहित्यक्षेत्र, कीडाक्षेत्र, महिला, युवक, आदिवासी, दलित या सर्व घटकांच्या संदर्भात काम करणाऱया संघटना समाविष्ट आहेत. तरीही ख्रिश्चन धर्मियांसाठी वेगळी संघटना रा.स्व. संघ काढू पहातो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही प्रामुख्याने हिंदुंमधील उच्चजातीय पुरुषांची संघटना आहे. ही संघटना स्वत:ची ओळख हिंदू संघटना म्हणून करुन देते. भारत हे हिंदूंचे राष्ट्र आहे, भारतातील प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे, असा दावा करणाऱया या संघटनेने मुस्लिम धर्माच्या लोकांमध्ये संघाचा विचार पसरविणारी राष्ट्रीय मुस्लिम मंच ही संघटना याआधीच स्थापन केली आहे. आता ख्रिश्चन धर्मियांमध्ये संघविचार पसरविण्यासाठी वेगळी संघटना काढण्याचे प्रयत्न संघाने सुरु केले आहे. यावरुन भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक धर्माचे आणि प्रत्येक संस्थेचे ब्राह्मणीकरण करण्याचा संघाचा मानस स्पष्ट होतो. ज्या धर्माचे अस्तित्व संघाला नको आहे, त्या धर्माच्या धर्मगुरुंशी जवळीक साधून त्यांची संघटना स्थापन करण्याच्या या प्रयत्नाकडे आंबेडकरी जनतेने स्वपरिक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे.

रा.स्व. संघाचे सर्वोच्च लक्ष्य ब्राह्मणांचे साम्राज्य प्रस्थापित करणे हे असले तरी ही बाब संघ परिवार उघडपणे बोलून दाखवत नाही. व्यवहारात आपल्या संघटनेचे स्वरुप हिंदुंची संघटना म्हणूनच ठसविण्यात संघ परिवार यशस्वी झाला आहे. हिंदू म्हणजे कोणताही विशिष्ट धर्म नव्हे तर हिंदू म्हणजे एक विचार, एक जीवनपद्धती आहे आणि भारतात रहाणारा प्रत्येक व्यक्ती मग तो कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा असला तरी तो हिंदूच आहे, ही रा.स्व. संघाची भूमिका आहे. ही भूमिका संघाचे मानवी मूल्यांवर अतोनात प्रेम आहे म्हणून घेतलेली नाही. किंवा संघ परिवार समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा सर्वोच्च पुरस्कर्ता आहे म्हणूनही संघाने अशी भूमिका घेतलेली नाही. संघाची ही भूमिका ब्राह्मणवर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी घेतलेली भूमिका आहे. ब्राह्मणवर्चस्व अबाधित ठेवायचे असेल तर देशाची राजकीय सत्ता हातात असणे आवश्यक आहे. राजकीय सत्ता कायमस्वरुपी स्वत:कडे ठेवायची असेल तर विरोधकांनाही आपलेसे करावे लागते. ज्यांच्याशी पराकोटीचे तात्विक आणि व्यवहारीक मतभेद असतात, त्यांचा विरोध सौम्य कसा होईल याची तजवीज करावी लागते. मनात असलेली तत्वनिष्ठा प्रगट न करता आपण तडजोडवादी आहोत, लवचिक आहोत याचे प्रदर्शन करावे लागते. त्याहीपुढे समाजात असलेल्या विविध गटांना, समुहांना त्यांची जातीय, सांप्रदायिक आणि धार्मिक ओळख बाजुला ठेऊन सर्वांना एक वर्ग म्हणून नवीन ओळख द्यावी लागते.संघ [अरीवर नेमके हेच करीत आहे.

मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी, दलित इ. वेगवेगळ्या सामाजिक आणि धार्मिक समुहांची वेगळी संघटना काढण्यामागे या समुहांचा हिंदू म्हणून एक वर्ग निर्माण करण्याचे संघ परिवाराचे उद्दिष्ट आहे. आपल्या या उद्दिष्टात संघ परिवार बऱयाच अंशी यशस्वी झाला आहे. सद्यस्थितीत भारतातील प्रत्येक राजकीय पक्षाला आपण हिंदूंचे कसे कैवारी आहोत, हे उर बडवून सांगावे लागते. जन्माने ख्रिश्चन असलेल्या सोनिया गांधींना तसेच त्यांचे पुत्र राहूल गांधी यांना आपण हिंदू आहोत हे दाखविण्यासाठी विविध हिंदू मंदिरात जाऊन पूजा करावी लागते व त्याचे प्रदर्शन करावे लागते. भाजपाचा घोर विरोध करणाऱया लालूपसाद यादव तसेच नितीशकुमार यांनाही बिहारची निवडणूक जिंकण्यासाठी आपण हिंदू आहोत हे ओरडून सांगावे लागते. धर्म म्हणजे अफूची गोळी समजणाऱया कम्युनिस्टांना दुर्गापूजेचे जाहीर कार्यकम आयोजित करावे लागतात. यावरुन जातीय किंवा धार्मिक ओळखीपेक्षा हिंदू म्हणून वर्गवाचक ओळख प्रस्थापित करण्यात संघ परिवार पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसते.

हिंदू ही वर्गवाचक ओळख निर्माण करण्याच्या संघाच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरवाद्यांचे कर्तृत्व तपासल्यास बाबासाहेबांनी अखिल भारतीय स्तरावर सर्व अस्पृश्य जातींना `अनुसूचित जाती' म्हणून मिळवून दिलेली वर्गवाचक ओळख समाप्त करण्याचे स्वघातकी चाळे महाराष्ट्रातील बौद्धांनी चालविले आहेत. अखिल भारतीय स्तरावरील हिंदू धर्मिय अनुसूचित जाती, ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मात धर्मांतरीत झालेल्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आवाहनानुसार बौद्ध धर्मात धर्मांतरीत झालेल्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती एकसारखी आहे. या जातींना पसारमाध्यमातून आणि व्यवहारात एकत्रितरित्या दलितवर्ग म्हणून संबोधले जाते. मात्र महाराष्ट्रातील बौद्धांना दलितवर्ग म्हणून आपली ओळख निर्माण होणे तुच्छतेचे आणि कमीपणाचे वाटते. यामुळे महाराष्ट्रातील बौद्ध अखिल भारतीय स्तरावरील हिंदू, मुस्लिम तसेच ख्रिश्चन धर्मातील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींपासून तुटला आहे. इतर प्रान्तातील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींना महाराष्ट्रातील बौद्ध तुच्छ लेखून हिंदू म्हणून त्यांच्याशी भेदभाव करीत असल्यामुळे महाराष्ट्रातील बौद्धांना अखिल भारतीय स्तरावर परकेपणाने पाहिले जाते. यामुळे आंबेडकरी चळवळीची प्रचंड हानी झाली आहे. रा.स्व. संघाने धर्माच्या पलिकडे जाऊन इतर धर्मियांना जोडण्यात जी लवचिकता दाखविली आहे त्याचा मागमूस महाराष्ट्रातील बौद्धांमध्ये नसल्यामुळे एकेकाळी अखिल भारतातील अस्पृश्य, आदिवासी, अल्पसंख्य समुहांचे नेतृत्व करणारा महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीचा महार आणि आताचा बौद्ध मायक्रो मायनॉरेटीमध्ये ढकलला गेला आहे.

भारतामध्ये हजारो वर्षांपासून ब्राह्मण विरुद्ध अब्राह्मण हा संघर्ष चालत आलेला आहे. इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात ब्राह्मणवादाविरुद्ध क्रांती होऊन समतावादी अब्राह्मणी विचार प्रस्थापित झाल्याची नोंद आपल्याला मिळते. याचबरोबर पराभूत झालेल्या ब्राह्मणवादाने स्वत:ला काहीकाळ सुप्तावस्थेत ठेऊन पुन्हा पतिक्रांती करुन समतावादी अब्राह्मणी विचाराला पराभूत करुन स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित केल्याचेही दाखले मिळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ऐतिहासिक चढाई आणि प्रतिचढाईचे स्वरुप विशद करण्यासाठी `भारतातील क्रांती आणि पतिक्रांती' या शिर्षकाचा ग्रंथ लिहिण्याचे योजिले होते. त्यासाठी बरीचशी प्रकरणेही त्यांनी लिहून काढली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध धर्माच्या, सामाजिक समुहाच्या वेगळ्या संघटना काढून त्यांच्यामध्ये ब्राह्मणवादी विचार रुजविण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु ठेवले आहेत. या प्रयत्नाचे क्रांती आणि पतिक्रांतीच्या निकषावर मोजमाप केले तर रा.स्व.संघ आपल्या धोरणात लवचिकता दाखवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारतात घडवून आणलेली संवैधानिक लोकशाही क्रांती समाप्त करण्याच्या जवळ पोहोचला आहे, तर आधुनिक भारतातील या महत्तम क्रांतीचे नायक असलेल्या बाबासाहेबांचे अनुयायी आपल्या ताठरपणापायी आणि धोरणात्मक नादानपणामुळे पतिक्रांतीचे वाहक ठरत आहेत.



--
Pl see my blogs;


Feel free -- and I request you -- to forward this newsletter to your lists and friends!

No comments:

Post a Comment